आरक्षणाचा इतिहास : सामाजिक न्यायासाठी प्रेरित करणारा ग्रंथ

ज्येष्ठ लेखक, संग्राहक तथा समिक्षक पंजाबराव चव्हाण 'याडी'कार यांच्या महाराष्ट्रभर पोहोचलेल्या 'आरक्षणाचा इतिहास' या ग्रंथावरील मंथन प्रतिभावंत साहित्यिक एकनाथ पवार यांच्या लेखणीतून....

आरक्षणाचा इतिहास : सामाजिक न्यायासाठी प्रेरित करणारा ग्रंथ

ज्येष्ठ लेखक, संग्राहक तथा समिक्षक पंजाबराव चव्हाण 'याडी'कार यांच्या महाराष्ट्रभर पोहोचलेल्या 'आरक्षणाचा इतिहास' या ग्रंथावरील मंथन प्रतिभावंत साहित्यिक एकनाथ पवार यांच्या लेखणीतून.... 
---------------------------------------------------------
आरक्षणाचा इतिहास : सामाजिक न्यायासाठी प्रेरित करणारा ग्रंथ
    - एकनाथ पवार, नागपूर
--------------------------------------------------------
सामाजिक चळवळीत गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत असल्याने आरक्षणाचा मुद्दा अगदी जवळून अनुभवताना एक बाब निक्षून सांगता येईल की,  सामाजिक न्यायाची संविधानिक हक्कविषयक कैफ ज्या प्रमाणात आणि ज्या पद्धतीने जडायला हवी होती, ते दिसून येत नसल्याची खंत या ग्रंथातून व्यक्त होणारी आहे.  हे पुस्तक नव्या पिढीला संविधानिक हक्काविषयी साक्षर करणारा ठरेल असा विश्वास वाटतो. 

खरंतर  समग्र न्यायवंचिताचा , संविधानिक हक्कापासून मुकलेल्या घटकांचा न्यायासाठीं प्रेरित करणारा एक शब्दकोष म्हणता येईल. ज्यात सामाजिक न्यायापासून मुकलेल्याची प्रतिबिंबे विविध रुपातून उमटलेली आहेत. लेखक/संकलकानी या ग्रंथाच्या सुरुवातीला लिहिले आहे की, "मी काही साहित्यिक , लेखक अजिबात नाही." आणि पुढे "नो शेती, नो बळद नो गावडी ओन्ली लिखाण..!"  खरंतर या सत्यामध्येच श्रीमंती अन् सौंदर्य दडलेले दिसून येते. साहित्य किती लालित्यपूर्ण किंवा आशयसंपन्न आहे यापेक्षा ते सर्व सामान्यांच्या मानवी हक्काशी , त्याच्या आत्मसन्मानाशी एकरुप किती होतो हे महत्वपूर्ण असते. कित्येक दशकांपासूनची सामाजिक न्याय , मानवी हक्क आणि आत्मसन्मानापासून देखील वंचित असलेल्यांच्या हक्काविषयीची जणू गाथाच ज्येष्ठ संग्राहक , लेखक पंजाबराव चव्हाण यांनी आपल्या क्षमतेनुसार या ग्रंथरुपाने वाचकापुढे आणली आहे. 
  
राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि  महानायक वसंतराव नाईक (शाहु-फुले-आंबेडकर- नाईक) या थोर महापुरुषांनी सामाजिक न्यायाचा मार्ग अतिशय प्रशस्त केला ज्यामुळे राष्ट्रहितासाठी, समाज उत्थानासाठी सदैव प्रेरणा मिळत जाते. संपूर्ण न्याय वंचितांच्या सबंधाने या ग्रंथात आलेखच मांडलेला आहे.  ज्यात विविध आयोग , समिती, आंदोलने आणि एकुणच लढयाचे संकलन करून नव्या पिढीला माहिती उपलब्ध करून दिली आहे खरंतर हे काम वाटते तितके सोपे नाही. 

या निमित्ताने एका महत्वपूर्ण बाबींकडे लक्ष वेधता येईल की, संविधानिक हक्कांसाठी लढा उभारतांना तथापि सामाजिक चळवळीत कार्य करीत असताना प्रागतिक विचारवंत तथा मंडल आयोगाचे सदस्य एल.आर.नाईक यांची डिसेंट नोट्स समाजाने अभ्यासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एल.आर.नाईक यांच्या डिसेंट नोट्स वर राष्ट्रव्यापी चर्चा घडून येणार नाही, तोपर्यंत सामाजिक न्यायापासून मुकलेल्या  विमुक्त भटक्या वंचित, ओबिसी शोषित घटकांच्या सामाजिक न्यायाची आर्जवता आणि उपयोगिता उमगणार नाही. बंजारा सह तत्सम वंचित , उपेक्षित आणि दुर्लक्षित अशा ओबिसीमधील न्यायवंचित जातीसमुहाला या निमित्ताने प्रथमदर्शनी ओळख या ग्रंथातून दिली आहे, जे कौतुकास्पद वाटते. परंतु दूसरी बाब म्हणजे विमुक्त भटक्यांच्या, ओबिसीच्या हक्कांसाठी ज्यांनी अनेक दशके मोर्चा, आंदोलन करुन संविधानिक हक्काविषयी जागरुकता आणली अशा काही लढयाची माहिती अपेक्षित होती तसेच संविधानाचे अभ्यासक माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी बंजारा क्रांती दलाच्या रुपाने सामाजिक चळवळीत पेटवलेली मशाल ही एका क्रांतीची सुरुवातच होती. ज्या आंदोलनाची धग हजारोनी अनुभवलेली आहे. तिसरी सुची ही खऱ्याअर्थाने समाजासाठी मोठी क्रांतीकारी उपलब्धी ठरली असती , परंतु समाजाने तिसरी सूचीची व्यापकता कधी समजून घेतली नाही , हे दूर्देव आमच्या संविधानिक हक्काविषयची अजाणीवतेची म्हणावी लागेल. 

१८७१ चा क्रिमिनल ट्राईब्ज ॲक्ट हे डिनोटिफाईड ट्राईब्जला संविधानीकच नव्हे तर मानवी हक्कापासून वंचित करणारा होता. परंतू  स्वातंत्र्योत्तर डिनोटिफाईड ट्राईब्जला 'स्वातंत्र्य सेनानी ट्राईब्ज' म्हणून आम्ही ओळख देऊ शकलो नाही. किंवा सी.पी.ॲंड बेरार गॅजेट्स , ब्रिटिश सेन्सस मधिल ट्राईब्ज आणि क्षेत्रिय बंधन यावर अपेक्षित लक्ष वेधता आले नाही. तथापि ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या पाठीशी समाजातील पहिली फळी उभी राहिली नाही हे एकुणच आरक्षणाच्या  लढयातील फलद्रूपता देखील या निमित्ताने अधोरेखित करणारी ठरते. तसेच आज धर्माच्या नावाखाली जे काही चित्र रेखाटून सत्तेचा शामियाना उभारला जात आहे, त्यात गौर बंजारांना किती स्थान आहे याची देखील चिकित्सा होणे गरजेचे आहे.  महायोद्धा लखीशाह बंजारा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने राष्ट्र धर्मासाठी बलीदान दिले. शूरवीर मनी सिंहाने शेकडो यातना भोगून राष्ट्र धर्मासाठी वीरगती प्राप्त केली या बलिदानाचे विस्मरण म्हणजे एक कृतघ्नपणाची नांदीच होय. महासंत हाथीराम महारांजाने नागौर पासून उत्तर मध्य दक्षिण भारतात धर्माची ज्योत प्रज्वलित केली.  संत रुप सिंह महाराज ,  क्रांतिकारी संत गोविंद गुरू , संत सेवालाल महाराज यांचे  दिव्यत्व असो अथवा शौर्याचा मानबिंदू असलेला जगातला सर्वात मोठा लोहगड किल्ल्याचे वैभव , धारची न्यायसनद आम्हाला व्यवस्थेपुढे आणता आले नाही. त्या प्रमाणेच एल.आर.नाईक यांची डिसेंट नोट आम्हाला आजवर पटवून देता आली नाही, खरंतर हे अपयशच म्हणावे लागेल. आजची लढाई ही केवळ आरक्षणाचीच नव्हे तर मानवी हक्कांची, राष्ट्र धर्मासाठी दिलेल्या बलिदानाच्या अस्मितेची आहे. हे विसरून चालणार नाही.   महानायक वसंतराव नाईक यांनी केवळ विमुक्त भटक्यांनाच नव्हे तर अनेक वंचित जातीसमुहांसाठी शाश्वत विकासाची योजना आखली. खरंतर आजच्या पिढीला आरक्षणाची मागणी करण्यापूर्वी आणि दावा करण्यापूर्वी राजर्षी शाहू महाराज , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महानायक वसंतराव नाईक समजून घेणे क्रमप्राप्त आहे. 

 'आरक्षणाचा इतिहास' या पुस्तकातून संविधानिक हक्काची किमान पायाभूत जाणीव तरी नव्या पिढीला व्हावी ही अपेक्षा आहे. ज्येष्ठ लेखक पंजाबराव चव्हाण सातत्याने 'लिहिते' आहेत,  हेच सध्याच्या काळातील मोठी मौलिकता‌ म्हणता येईल. लिहिते असणे हेच या लेखकांचे 'मोठेपणा , लढवय्येपणा आणि जिवंतपणा' देखील आहे. सध्याच्या काळात अनेक भूमिगत होऊन लेखणी म्यॅन केल्याचे चित्र दिसते. खरंतर स्वतः मधला लेखक जिवंत असणे हे सामाजिक चळवळीला उभारी देणारा असतो. हा लेखक जिवंत आहे हेच त्यांच्या साहित्यप्रवासाचे वैभव म्हणता येईल.    काही बाबी वगळता या ग्रंथातील माहिती वाचनीय आणि संग्रहणीय आहे. प्रथमदर्शनी नजरेत भरणारा असा हा संग्रहग्रंथ असून या संग्राहक ग्रंथाचे सुज्ञ वाचक नक्कीच स्वागत करतील. आणि   ज्येष्ठ लेखक पंजाबराव चव्हाणांची लेखणी अशीच 'वसंतासम' बहरत रहावी या सदिच्छासह...
        
  • (लेखक, भाषा साहित्य संस्कृतीचे तथा सामाजिक लढ्याचे अभ्यासक आहेत.)